VNI:-
नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश; तीन नक्षल समर्थकांना अटक
- तीन नक्षल समर्थकांना नक्षली बॅनर लावतांना अटक.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : २८ जुलै ते ०३ ऑगस्ट या दरम्यान नक्षलवाद्यांकडून नक्षल शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या दरम्यान नक्षलवादी शासन विरोधी योजना आखुन रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी अंकित गोयल पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली मा. समीर शेख अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक (अभियान), अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यांचे नेतृत्वात नक्षलवाद्यांचे मनसूबे हाणून पाडण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे.
पोलीस उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीत पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे रेपनपल्ली परिसरात उपपोस्टे रेपनपल्लीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवितांना २८ जुलै २०२२ रोजीचे रात्रो दरम्यान उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापूर- दामरंचा जाणाऱ्या मेन रोडवर पवनकुमार फकीरचंद उईके रा. कमलापूर, ता. अहेरी जि. गडचिरोली, प्रफुल देवानंद बट रा. वरुड ता. मारेगाव जि. यवतमाळ, अनिल गोकुळदास बट रा. कमलापूर ता. अहेरी जि. गडचिरोली. हे २८ जुलै नक्षल शहीद सप्ताहादरम्यान आजुबाजुच्या परिसरात दहशत निर्माण करण्याकरीता भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या भा.क.पा. माओवादी संघटनेचे नक्षल बॅनर लावून शासनाविरुध्द कट रचतांना मिळून आले. यावरून नमुद आरोपीतांविरुध्द उपपोस्टे रेपनपल्ली येथे अ.प.क्र ०२ / २०२२ कलम १२० (ब) ३४ भादंवि सहकलम बेकायदेशीर प्रतिबंध अधिनियम १९६७ कलम १०,१३,२०, मपोका कलम १३५ अन्वये २८ जुलै २०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून, सदर तिन्ही आरोपीतांना २८ जुलै २०२२ रोजी रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली असुन त्यांना आज २९ जुलै २०२२ रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचेसमोर हजर केले असता न्यायालयाने ०८ आगस्ट २०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली असून, सदर घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.