विशेष लेख : शिक्षकांबद्दल ना आदर, ना आस्था ! कारण... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

विशेष लेख : शिक्षकांबद्दल ना आदर, ना आस्था ! कारण...

दि.12.09.2023

MEDIA VNI 

विशेष लेख : शिक्षकांबद्दल ना आदर, ना आस्था ! कारण...

मीडिया वी.एन.आय : 

दिल्ली : माझ्या पिढीतल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी असणारा गहिरा आणि भावुक संबंध आज दिसत नाही. गेल्या तीस-चाळीस वर्षांत समाजाच्या स्वरूपातच मूलगामी बदल झाल्याने समाजातील शिक्षकांच्या स्थानाविषयी विचार करताना समकालीन राजकारण, समाजकारण, अर्थकारण, तंत्रज्ञानाचे वाढते आक्रमण, ढासळती मूल्य व्यवस्था, खासगी शाळांचे प्रस्थ, नवी शिक्षणप्रणाली व तिच्या अंमलबजावणीबाबतची संदिग्धता या सर्व गोष्टींचा ऊहापोह होणे अपरिहार्य आहे.

अनेकविध आयामांच्या मिश्रणातूनच समाजातील शिक्षकांचे स्थान ठरते.

बाजारीकरणानंतरच्या खासगीकरणाचा एक चेहरा म्हणजे अमर्याद पैशाची भूक. भांडवलशाहीच्या अमर्याद व अनियंत्रित विस्तारातून समाजातील आर्थिक विषमता कल्पनेपलीकडे वाढली. त्यातूनच एका वर्गाकडे इतकी संपत्ती झाली की, त्या वर्गातले लोक मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल तितके शुल्क भरायला तयार असतात. अशा शाळा पण 'इंग्रजी माध्यम, आधुनिक सुविधा, वातानुकूलित वर्ग' अशा बॅनरमुळे ट्रेंडसेटर होतात. मग गरीब मुलांच्या आई-वडिलांनाही आपली मुले त्याच शाळेत जावीत असे वाटते. ते कर्ज घेऊनही मुलांना अशा शाळांमध्ये घालायला उत्सुक असतात. आता या दोनही वर्गांतील मुलांना शिक्षकांविषयी आदर वाटावा, अशी अपेक्षा कशी करावी ? या परिस्थितीला शिक्षक जबाबदार नाहीत, असे मानले तरी ते याच शिक्षणव्यवस्थेचेच घटक आहेत.

दुसरीकडे सरकारी शाळा सरकारच्याच उपेक्षेच्या बळी झाल्या आहेत. एका बाजूला अपुरी वित्तीय तरतूद, दुसरीकडे खासगी शाळांच्या तुलनेत मिळणारा सापत्नभाव! शिवाय इंग्रजी शाळांकडे वळणारे विद्यार्थी आणि सुविधांचा अभाव यामुळे पटसंख्या कमी होतेय. म्हणून शाळाच बंद होण्याची भीती अशा दुष्टचक्रात या शाळा अडकल्या आहेत. त्यातून तरलेल्या शाळा मोजक्याच ! अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त शिक्षकांकडून इतर कामे करून घेण्याचा सपाटाही सरकारने चालवला आहेच. या शाळेतील शिक्षकांचे समाजातील स्थान म्हणूनच दुर्दैवाने दुय्यम दर्जाचे झाले आहे.

शिक्षक भरतीतील अनियमितता, गैरव्यवहार, राजकीय हस्तक्षेप, खासगी शाळांमधील शिक्षक भरतीत शिक्षकांकडून देणगी, नोकरीत कायम करण्याबाबत कुचराई, पगारांमधील अवैध कपात, पेन्शनचा अभाव, बदलीतील गैरव्यवहार अशा पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या नैतिकतेवर व निष्ठेवर प्रश्नचिन्ह लावणेही अवघड होऊन जाते.

विद्यार्थी, समाज व शासन शिक्षकांकडे आणि शिक्षणाकडे कसे पाहतात ? आता विद्यार्थी परीक्षार्थी झाले आहेत. कोविड गेला तरी ते ऑनलाइनवरून वास्तवात उतरलेले नाहीत. माजी विद्यार्थ्यांना शिक्षकांची नावेही आठवत नाहीत. शिक्षणाविषयी ते गंभीर नाहीत, त्यांचा करिअरवर फोकस आहे. शिक्षक या प्रवासातील एक अपरिहार्य भाग आहेत, एवढेच !

समाजाच्या नजरेत शिक्षकांना पूर्वीसारखी प्रतिष्ठा राहिलेली नाही. वृत्तपत्रांमधल्या बातम्या आणि सोशल मीडियावरची भडक रिल्स यावरून ते शिक्षकांविषयी मत बनवतात. पूर्वी शिक्षक हा खेड्यापाड्यातून 'फ्रेंड फिलॉसॉफर ॲण्ड गाइड' अशी भूमिका निभावत असे. गावातील भांडणे सोडवणे, लग्न जमवणे, मुलांच्या पालकांशी आपुलकीचे नाते असणे, निवडणूक असो वा जत्रा; त्यात शिक्षकांना आदराचे स्थान होते. शिक्षक गावातून जाताना दिसला तर आदराने त्यांना 'राम.. राम.. नमस्कार' आणि 'चहाला या' असे लोक म्हणायचे. तर त्यांच्या दराऱ्यापोटी मुलं-मुली घरातल्या पोत्यांच्या मागे लपत. हा आदर आणि त्या भूमिका आता लयाला गेल्या असून, शिक्षक हा जणू सप्लाय चेन (पुरवठा साखळी) मधील एक 'सर्व्हिस प्रोव्हायडर' झाला आहे.

या शिक्षकांकडे आज शासन कसे पाहते ? दोन-तीन दशकांपूर्वी 'झीरो बजेटिंग' ही एक विलक्षण संकल्पना आली, त्यातून एक विलक्षण आपत्ती आली' शून्य भरती! शून्य भरतीतून पुढे विनाअनुदानित नावाची अजून एक गोष्ट प्रस्तुत झाली. तिने खासगी शाळांच्या परवानग्या सोप्या झाल्या. पण, पारंपरिक शिक्षण व्यवस्थेचे कंबरडे मोडले. त्यातून उद्भवलेल्या गोंधळातून अजून एक सुपीक असे विज्ञान आले: 'क्लॉक अवर बेसिस' म्हणजे शिक्षकांना 'तासांवर आधारित वेतन'! आज एकाच महाविद्यालयात अनुदानित, विनाअनुदानित आणि तासंदारीवर काम करणारी अजब व्यवस्था सुरू आहे. एका बाजूला १० हजार रिक्त जागा, दुसरीकडे शिक्षक भरतीच्या नियमित घोषणा आणि प्रत्यक्षात अनाकलनीय दुरवस्था. प्राध्यापक भरती आणि प्राचार्य नियुक्तीत पैशाची मोठी देवघेव होते, असेही सर्रास म्हटले जाते.

आता या सगळ्या कारभारातून समाज परिवर्तन, राष्ट्राबांधणी, एक सुसंस्कृत नवी पिढी कशी घडणार ? फक्त जेईई, नीट, आय.एस.ची तयारी या पलीकडे समाजाला कशाचीच गरज नाही का? समाज शास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, संपादक, भूमी, जल अवकाश विशेषज्ञ, साहित्यिक, स्थापत्य विशारद, संरक्षण, सामदिक विषय, राजकारण, परराष्ट्र धोरण, प्रशासन, शेतीतज्ज्ञ, इत्यादींचे अभ्यासक, उद्योजक, विमान, बोरी यांची बांधणी करणारे अभियंते या आणि इतर अनेक विषयांतले मुरब्बी लोक तयार करण्याची जबाबदारी कोण घेणार ? समाज ? राज्यकर्ते ? शिक्षण संस्था ? की शिक्षक ?.

आदर्शवादाने व समाजपरिवर्तनाच्या वेगाने झपाटलेल्या संस्था आपल्याकडे लौभ्या राहिल्या. पण, हळूहळू, कर्मवीर, शिक्षण महर्षी यांचे युग संपून आता शिक्षण सम्राट किंवा 'टायकून' झाले आहेत. एकेकाळी व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असणारा शिक्षक आज परिघावर येऊन स्थिरावला आहे. सरकारी शाळा आणि कॉलेजांमधल्या शिक्षकवृंदाची ही शेवटची पिढी आहे की, काय अशी शंका येते.

लेखन - डाॅ. ज्ञानेश्वर मुळे (सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली)

Share News

copylock

Post Top Advertisement

-->