दि. 15 नोव्हेंबर 2024
गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : जिल्ह्यात वनक्षेत्र, खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. येथे उद्योगाला वाव आहे; पण त्यासाठी चांगले रस्ते, दळणवळण, पाणी व वीज या बाबी गरजेच्या आहेत. मात्र, वनविभागातील काही अधिकाऱ्यांनी कामे अडवून ठेवली आहेत.
हे झारीतील शुक्राचार्यच खरे समस्यांचे मूळ आहेत. स्वत: एक झाड लावत नाहीत अन् सामान्यांच्या हिताचे प्रकल्प अडवून ठेवतात, अशी कानउघाडणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. रायपूर – विशाखापट्टणम् या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाशी गडचिरोलीला जोडणार आहे. हा मार्ग धानोरातून छत्तीसगडला जोडला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा राज्यात सर्वात सुखी, समृद्ध व संपन्न बनेल, असा विश्वास त्यांनी दिला.
आष्टी येथे अहेरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंत्री धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे महायुतीचे उमेदवार तसेच कुरखेडा येथे आरमोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांनी १५ नोव्हेंबरला दोन सभा घेतल्या. आष्टीतील सभेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांची उपस्थिती होती, तर कुरखेडाच्या सभेत मंचावर राज्य सहकार महामंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड्डीवार, माजी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी उपस्थित होते.
वनविभागाविरुद्ध आंदोलने करा
यावेळी गडकरी म्हणाले, मी मंत्री झाल्यानंतर गडचिरोलीत चार हजार कोटी रुपयांतून ३५ कामे केली. आष्टी – सिरोंचा या महामार्गासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मात्र, वनविभाग व वन्यजीव विभागाच्या परवानग्या मिळणे बाकी आहे. आतापर्यंत या जिल्ह्याचा विकास रखडण्यामागे वनविभागाचेच अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरुद्ध आंदोलने करा. ते सरळ झाल्याशिवाय विकास होणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. मी पर्यावरणवादी आहे. महामार्गांवर मी साडेचार हजार कोटी झाडे लावली. ८७ हजार झाडांचे पुनर्रोपण केले. पर्यावरणपूरक वाहनांची निर्मिती केली, असे त्यांनी सांगितले.
…तर गडचिरोलीचा जमशेदपूरप्रमाणे विकास झाला असता
जमशेदपूर येथे स्टील प्रकल्प उभारण्यापूर्वी जमशेद टाटा हे गडचिरोलीत घोड्यावरून आले होते. सुरजागड येथे त्यांनी पाहणी केली होती; पण त्यांना वनविभागाने परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांनी झारखंडमध्ये जमेशदपूरला टाटानगर बनवले. तेथे लाखो लोकांचे जीवनमान बदलले. हे तेव्हा गडचिरोलीत झाले असते तर इथल्या लोकांना फाटके कपडे घालण्याची वेळ आली नसती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सुरजागड येथे लोहउत्खनन होत आहे; पण तेथे ड्रायव्हिंग स्कूल, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू व्हावे, ९० टक्के स्थानिकांना रोजगार मिळावा, असे मी बजावले आहे. अन्यथा उद्योग बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.
Forest department biggest obstacle to Gadchiroli development: Union Minister Nitin Gadkari