दि. 27 ऑगस्ट 2026
कोटी–कोरणार पुलिया प्रकरणावर बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन; दोषींवर कारवाईसाठी आजाद समाज पार्टी आक्रमक.!
- सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना दिले निवेदन.!
- ₹550 कोटींच्या कामांची चौकशी, ताळगुडा पुलाची तपासणी करण्याचीही मागणी; “दोषींना पाठीशी घालू नका”
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : कोटी–कोरणार पुलिया दुर्घटना, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ₹550 कोटींच्या सार्वजनिक बांधकामांतील भ्रष्टाचार आणि एटापल्ली तालुक्यातील ताळगुडा पुलाची दयनीय अवस्था या गंभीर विषयांवर आजाद समाज पक्षाच्या शिष्टमंडळाने आज सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी मंत्र्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कोटी–कोरणार पुलिया दि. 29 जुलै रोजी कोसळल्यानंतर आजाद समाज पक्षाने सर्वप्रथम हा मुद्दा उचलून धरला होता. पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन, पत्रकार परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने या प्रकरणी SIT चौकशी नियुक्त केली आहे.
मात्र, कंत्राटदारावर अद्याप ठोस कारवाई का होत नाही? असा सवाल आजाद समाज पक्षाने उपस्थित केला आहे. पक्षाच्या आरोपानुसार, कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया विभागीय पातळीवर सुरू न होणे ही गंभीर बाब असून, कंत्राटदाराला संरक्षण कोण देत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ₹550 कोटींच्या विविध सार्वजनिक बांधकामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे. निविदा प्रक्रियेपासून कामांचे वाटप, Design Change, वाढीव खर्च, गुणवत्ता तपासणी, मोजमाप व देयकांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली. सर्व कामे एका विशिष्ट कंत्राटदाराला देण्यात आली असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, गठ्ठा–गर्देवाडा मार्गावरील ताळगुडा पुलाचीही तातडीने Structural Audit व तांत्रिक तपासणी करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे या पुलाचेही लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री यांच्या हस्ते झाले होते.
यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, प्रतीक डांगे व सतीश दुर्गमवार उपस्थित होते.
विनोद मडावी यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून कोटी–कोरणार प्रकरणासह ₹550 कोटींच्या कामांतील कथित अनियमितता व ताळगुडा पुलाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
“SIT स्थापन झाली म्हणजे प्रश्न संपलेला नाही. चौकशीच्या नावाखाली दोषी अधिकारी किंवा कंत्राटदाराची पाठराखण होऊ नये. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत आजाद समाज पार्टी शांत बसणार नाही असा ईशारा दिला.