दि. 23.09.2023
नागपूरमध्ये पावसाचं विक्राळ रूप समोर; 2 महिलांनी गमावला जीव तर 14 जनावरे दगावली.!
मीडिया वी.एन.आय :
नागपूर : नागपूरमध्ये रात्री झालेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण केली होती. आता पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा देखील होत आहे, हे असताना दुसऱ्या बाजूने गांधी नगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने आता त्यांच्या घरात गाळ आणि चिखल साचला आहे.
अन्न धान्य आणि घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले असून आता सापासारखे जीव देखील घरात आढळून येत आहे. तर कालपासून झालेल्या मुसळधार पावसामध्ये नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन वयोवृद्ध महिला मृत्यूमुखी पडल्या आहे.
400 लोकांना बाहेर काढले
मुसळधार पावसानंतर ओढावलेल्या परिस्थितीनंतर आता बचावकार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराचे पथक काम करत आहे. आतापर्यंत 400 लोकांना बाहेर काढण्यत आलं आहे. प्रशासनाकडूनही काम सुरू आहे. पाऊस थांबल्यानं पाणीही ओसरायला लागलं असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, या घटनेत दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. मिराबाई पिल्ले, 70 वर्षीय वृद्ध महिला महेश नगर येथे मृत्युमुखी पडल्या. तर तेलंगखडी परिसरातील सुरेंद्रगड नगरमध्ये 80 वर्षीय संध्या शामराव ढोरे यांचा मृत्यू झाला. यासोबत तर 14 जनावरेही दगावली आहेत. दरम्यान, इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देंवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नागपूरसह परिसरात शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सायंकाळी नागपूरमध्ये जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
◆ पाऊस आला आणि सगळं काही बरबाद झालं!
खूप साऱ्या लोकांनी कर्ज काढून इथं बिझनेस स्थापन केला होता. पण ते सगळं बुडून गेलंय. सगळं काही नष्ट झालंय. आता आम्हाला काय अपेक्षा? प्रशासनाने आधी सांगितलेलं नाही, सगळं बरबाद झालंय, अशी प्रतिक्रीया अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागपूरमधील व्यावसायिकाने व्यक्त केलीय.
प्रशासनाने आम्हाला पाऊसासंदर्भात कुठलीहीच माहिती दिली. आधी काहीच सांगितलं नाही. त्याची जबाबदारी कोण घेणार. हे प्रशासनाचं अपयश आहे. त्यामुळे त्यांनी पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागपूरमधील व्यावसायिकांनी केली आहे.
अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो होईल, याचीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही. आधीच या ठिकाणची कामं प्रलंबित आहेत. ही रखडलेली कामं आधीपासून निपटवले नाहीत. आमच्या सेक्रेटरींनी वारंवार पत्रव्यवहार केला. पण प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. मागच्या शाळेची भींत पडलीय आणि त्यामुळेच हे सगळं पाणी थेट आमच्या दुकानात घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रीया नागपूरमधील व्यावसायिकांनी दिली.
आम्ही खरंच बरबाद झालोय. त्यामुळे प्रशासनाने आमच्या दुकानदारांना नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
Monstrous form of rain in Nagpur flood 2 women lost their lives and 14 animals died