दि. 28.02.2024
सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या, बदली होत नसल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती.! (Mumbai Police Officer Suicide)
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : सांताक्रुझ पूर्वेत वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत कलिना पोलीस कॅम्पमध्ये पोलीस अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडलीय. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे (Pralhad Bansode) यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवर जाऊन संध्याकाळी 8 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रल्हाद बनसोडे हे जळगावचे निवासी होते. त्यांना जळगावला बदली पाहिजे होती, त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यांची बदली होत नव्हती. मात्र याच तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.
सध्या वाकोला पोलिसांनी ADR दाखल करून घेतली आहे. मुंबई पोलिसातील या अधिकाऱ्याने टोकाचा पाऊल का उचललं या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
🔷 अशीच एक घटना गडचिरोली येथे घडली होती..!
डोक्यात गोळ्या झाडत एसआरपीएफ जवानानं जीवन संपवलं
गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उत्तम किसनराव श्रीरामे असे या 32 वर्षीय आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘ माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवलं होतं.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उत्तम यांचे तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांनी यापूर्वी पुणे येथील राज्य राखीव दलाच्या गट क्र.1 मध्ये सेवा बजावली होती.नंतर ते गडचिरोली जिल्ह्यातील शिखरदीप या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी ही आत्महत्येची थरारक घटना घडली.
त्या घटनेनंतर जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर धाव घेतली आणि मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवण्यात आला.