दि. 17 मे 2025
सत्ताधाऱ्यांकडून गडचिरोलीतील खनिज संपत्ती लुटण्याचा डाव; विजय वडेट्टीवार यांचा आरोप.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोलीला 'स्टीलहब' बनवण्याचे स्वप्न दाखवून सत्तेतील तिन्ही पक्षांना येथील खनिज संपत्ती लुटायची आहे. म्हणूनच खाणपट्ट्यांचे खुले लिलाव न करता 'जिंदाल'सारख्या कंपनीला नियम वाकवून अल्प महसुलावर लोहखनिज देण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे.
यातून सत्तेतील तीनही पक्षांना महिन्याकाठी प्रत्येकी ५०० कोटी रुपये अवैधपणे मिळणार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.१७) सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे पत्रकार परिषदेत केला.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, जिंदाल उद्योग समूह देसाईगंज, वडसा तालुक्यात स्टील उद्योग उभारणार असून, त्यासाठी २ हजार १२८ हेक्टर खासगी व १७४ हेक्टर सरकारी अशी एकूण २ हजार ३०३ हेक्टर जमीन अधिग्रहीत करणार आहे.
खनिज संपत्तीमुळे सर्वांचे लक्ष गडचिरोली जिल्ह्याकडे लागले आहे. नुकतेच 'जेएसडब्लू' कंपनीने गडचिरोलीत एक लाख कोटीची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांना देण्यात आलेल्या खाणपट्ट्याची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने खुल्या पद्धतीने लिलाव करून हा पट्टा 'जिंदाल'ला द्यायला हवा. त्यामुळे सरकारी तिजोरीत प्रतिटन २३०० रुपयांचे स्वामीत्व शुल्क जमा होईल. पण तसे न करता सध्य:स्थितीत सुरजागड टेकडीवर उत्खनन करणाऱ्या कंपनीला जुन्या प्रतिटन ६५० रुपये स्वामित्व शुल्कावर हे काम देण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचले आहे. यातून संबंधित कंपनीला महिन्याला ५००० हजार कोटींचा नफा होईल. यातून सत्तेतील तीनही पक्षाला महिन्याकाठी प्रत्येकी ५०० कोटी मिळणार आहे. भाजपचे खासदार जिंदाल यांची ही कंपनी असल्याने केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्यांना मदत करीत आहे. यासाठी राजकीय नेते आणि उद्योजक यांचे 'रॅकेट' सक्रिय झाले असून गडचिरोलीतील जनतेला प्रदूषणाच्या दारात ढकलून त्यांच्या खनिज संपत्तीवर मजा मारण्याचा या सर्वांचा डाव आहे. त्यासाठीच 'मायनिंग कॉर्पोरेशन' स्थापन करण्यात आल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
या उद्योगामुळे आठ गावे होणार प्रभावीत...
या उद्योगामुळे कोंढाळा, कुरुड, वडसा, नैनपूर, तुळशी, कोकळी, शिवराजपूर, वडेगाव इत्यादी ८ गावे बाधित होणार असून ४ गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.
पत्रकार परिषदेला गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना एक कोटी प्रतिहेक्टर द्या..
कोनसरी येथे लोहखनिजावर आधारित प्रकल्प आकाराला येतो आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन संपादित करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. देसाईगंज परिसरात 'जेएसडब्लू' कंपनी लोह प्रकल्पासाठी जवळपास २३०० हेक्टर जमीन खरेदी करणार आहे. ग्रामीण भागात ६ ते ७ लाख प्रतिहेक्टर आणि शहरी भागात २५ ते २८ लाख प्रति हेक्टर मोबदला देण्यात येणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन आहे. या जमिनी देऊन येथील शेतकरी कुठे जाणार? विशेष म्हणजे, जिंदाल एक लाख कोटींची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणार आहे. मग एकाचवेळी एवढी जमीन का घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सरसकट एक कोटी प्रतिहेक्टर आणि दोन एकर मागे एकाला नोकरी देणार असेल तरच या जमिनी कंपनीने विकत घ्याव्या, अन्यथा काँग्रेस गावागावात जाऊन याचा विरोध करणार आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. कोनसरी येथे स्थानिकांना किती रोजगार मिळाला हाही संशोधनाचा विषय आहे. लवकरच खासदार या संदर्भात खुलासा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Plot to loot mineral wealth in Gadchiroli by rulers; Vijay Wadettiwar's allegation.!
#गडचिरोली #Gadchiroli #MediaVNI #Maharashtra