दि. 07 मे 2026
रस्ते-पुलांची कामे रखडल्याने जिल्हाधिकारी संतप्त ; राष्ट्रीय महामार्ग विभागाला 'कारणे दाखवा' नोटीसचा दट्ट्या.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : मान्सूनचा काळ जवळ येत असतानाच रस्ते आणि पुलांची कामे विहित मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी उग्र रूप धारण केले.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मे २०२६ रोजी दोन स्वतंत्र नोटिसा जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या प्रकल्पांमधील दिरंगाईवर बोट ठेवण्यात आले आहे.भामरागड तालुक्यातील लाहेरी-बिनागुंडा या मार्गावरील गुंडेनूर नाल्यावरील दोन महत्त्वाच्या पुलांचे बांधकाम १८ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दोन वर्षांचा विलंब होऊनही हे काम अद्याप अपूर्णच आहे.
२९ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब उघडकीस आली.आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीमध्ये नमूद केले आहे की, गडचिरोली जिल्हा हा घनदाट अरण्याने आणि नद्यांच्या जाळ्याने व्यापलेला आहे.
मान्सून लवकरच सुरू होणार असून पुलांअभावी बीनागुंडा परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होण्याची भीती आहे.
जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारीचे व अशोभनीय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना बजावलेल्या नोटीस मध्ये नमूद आहे. या दिरंगाईमुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या विविध कलमान्वये (कलम ३०.२, ५५ आणि ५६) ही नोटीस बजावण्यात आली आहे.
याअंतर्गत पुलांच्या कामाबाबत ५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. आलापल्ली-सिरोंचा रस्ते कामाबाबत ६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि सार्वजनिक गैरसोयीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
पावसाळ्यात नागरिकांचे हाल निश्चित?
भामरागड तालुक्यातील लाहेरी-बिनागुंडा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. पोलिस दलाने प्राणाची बाजी लावून हा परीसर माओवादमुक्त केला. त्यामुळे येथे शासन-प्रशासन पोहोचू शकले. पण आता सरकारने या परीसराची दुर्गमता संपवण्यासाठी दळणवळणाच्या सोयी निर्माण करण्याची गरज आहे. येथील अवाढव्य गुंडेनूर नाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नाल्याच्या पलिकडे असलेल्या बिनागुंडासह अनेक गावांचा जगाशी संपर्क तुटतो. दुसरीकडे आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे भिजत घोंगडे कोरोना काळापासून पडले आहे. कोरोना आला आणि गेलाही पण हा मार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. जिल्हाधिकारी पंडा यांनी कारवाईचा कडक इशारा दिला असला, तरी सध्या मे महिना सुरू असून उन्हाळा अखेरच्या टप्प्यात आहे. जी कामे इतक्या वर्षांत पूर्ण होऊ शकली नाही ती एक-दोन महिन्यात पूर्ण होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.
District Collector angry over stalled road and bridge work; 'Show cause' notice issued to National Highways Department!
#गडचिरोली #Gadchiroli #breaking #News #MediaVNI #Maharashtra