दि. 02 मार्च 2024
MEDIA VNI
MSRTC Bus : गडचिरोली जिल्ह्यात बस पेटली, भडकली मात्र काँग्रेस; मंत्री आत्रामांवर केला प्रश्न 'क्या हुआ तेरा वादा?'
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या भंगार बसेसमुळे नागरिकात संतापाची लाट आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी नव्या 51 बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अन्न व प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले होते.
गडचिरोलीत एसटी महामंडळाचे दोन आगार आहेत. या दोन्ही आगारातील बसेसची अवस्था पूर्ण भंगार झाली आहे. एकतर बसेसचा अभाव दुसरीकडे नादुरुस्त वाहनांचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. आता तर एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळच होत आहे. एसटीला प्रवाशांचा जीव घ्यायचा आहे काय? असाच प्रश्न केला जात आहे. मुलचेरा-घोट मार्गावर एसटी महामंडळाच्या धावत्या बसने पेट घेतला. चालक-वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. काही दिवसांपूर्वी गडचिरोली-चामोर्शी मार्गावर चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचे छतच उडाले होते. हा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजला होता. त्यानंतर गडचिरोलीतील एसटी महामंडळाची दैनवस्था समोर आली आहे. एकेकाळी समृद्ध असलेला अहेरी आगार आता पुरते भंगारखाना झाले आहे.
बसेसची संख्या मोजकीच असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या कमी असल्याने एसटीत प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रवासी व वाहकाची होत असलेली दैना दिसून येते. या व्हिडिओचा आधार घेत काँग्रेसने राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर निशाणा साधला आहे. आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याला 51 नवीन एसटी बसेस देण्याचे आश्वासन दिले होते, पण हे आश्वासनच राहिले. जिल्ह्यात बसेसअभावी प्रवाशांचे हाल होत असताना मंत्री स्वखर्चाने खासगी बसेसद्वारे भक्तांना अयोध्या दर्शन घडवित आहेत. त्यामुळे काँग्रेसने आत्रामांना 'क्या हुआ तेरा वादा' असा प्रश्न विचारला आहे. धर्मरावबाबा आत्राम हे राम भक्तांसाठी जे काम करीत आहेत त्यात गैर काही नाही. पण त्यांनी सामान्य प्रवाशांचा पण विचार करावा, असे सांगत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
चालले मोठे निवडणूक लढायला.!
गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्ट केले. लोकसभा मतदारसंघातील 21 तालुक्यांत आपल्या कामांना सुरुवात झाली असल्याची माहिती आत्रामांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आता नेमका हाच मुद्दा घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 20 तालुक्यांचा समावेश होतो, पण आत्रामांना मतदारसंघाची साधी माहिती नाही. मतदारसंघाची माहिती नसताना आत्राम निवडणूक लढायला निघाले आहेत, असे सांगत ब्राह्मणवाडे यांनी आत्रामांना चांगलेच चिमटे काढले.
MSRTC Bus : Bus caught fire in Gadchiroli