दि. 19 ऑगस्ट 2024
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली, सरकारचा प्लॅन काय? बघा राजकीय घडामोडी..
मीडिया वी.एन.आय :
विशेष प्रतिनिधी: मुबंई : गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली, मात्र त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरमध्ये होतील, असं बोललं जात होतं.मात्र आता राज्यात गुलाबी थंडीत राजकारणाचा पारा चढण्याची शक्यता आहे. कारण राज्यात विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 26 नोव्हेंबर 2024 पूर्वी पार पडणे अपेक्षित आहे. मात्र यंदा मुदत संपल्यानंतर निवडणुका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याला 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे.
महाविकास आघाडीचा निशाणा..
महाविकासआघाडीच्या नेत्यांनी यावरुन पंतप्रधान मोदींसह राज्यातील सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय. तर सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती असल्यानं निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
सरकारचा प्लॅन काय.?
नुकताच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा पहिला-दुसरा हफ्ता बहिणींना मिळाला. मात्र आणखी किमान दोन हफ्ते द्यावेत, अशी सरकारची भावना आहे. म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे आणखी सहा हजार कुठल्याही आचारसंहितेत न अडकता लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावेत आणि अधिकाधिक महिला मतदार आकर्षित व्हाव्यात, असा सरकारचा प्लॅन असल्याचे बोललं जातंय. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभेचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रपती राजवटीचे संकेत..
पाच वर्षांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सोबत झाल्या होत्या. मात्र यंदा राज्यात विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होतील अशी चर्चा सुरु आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याची चर्चा रंगली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबणीवर जातील अशी कुजबूज सुरु आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तेव्हाच महाराष्ट्रातील निवडणूक लांबणीवर पडेल, असे संकेत मिळाले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांत निवडणुका घेता येत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितले होतं. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेतच त्यांनी दिले होते. राज्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला पूर्ण होतेय. विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते. 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाली तरी संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. काही आठवड्यांमध्ये मतदान होऊन निकालही जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात काही गैर नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
President's rule in Maharashtra, what is the government's plan? Look at the political events.. #महाराष्ट्र #MaharashtraNews #Mumbai #government #election #marathinews #political #politics #vidhansabha #MediaVNI