मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली /देसाईगंज : सध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे राहत आहे. या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीर दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी पंचायत समितीच्या सभागृहात दि. 7 एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तथा ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच तहसीलदार प्रीती डुडुलवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खोचरे मॅडम, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, कमलेश बारस्कर, सागर वाढई, विलास बन्सोड, जावेद शेख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर भर्रे, परसराम ठाकरे, प्रमोद पत्रे, विजय पिल्लेवाण यांची देखील उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान विविध गावांतील जलस्त्रोत, बंद पडलेली विहिरी, बिघडलेले बोरवेल्स, टँकरने पाणीपुरवठा, तसेच शासनाच्या जलसंधारण योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार मसराम यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, एकाही गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात यावी.
यावेळी काही ग्रामपंचायत प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या असता, आमदारांनी त्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
बैठकीचा उद्देश केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याचा होता, असे आमदार मसराम यांनी सांगितले.
Review meeting of MLA Ramdas Masram to overcome water scarcity!
#Gadchiroli #MediaVNI #Maharashtra