दि. 06 जुलै 2026
राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे..- खरीप हंगाम २०२६ मध्ये ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा; राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजारांचे बक्षीस
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन अधिक उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
राज्यातील अनेक शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग, सुधारित बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादनात उल्लेखनीय वाढ साधत आहेत. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार व्हावा आणि राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात भर पडावी, या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.
खरीप हंगाम २०२६ मध्ये तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार असून संबंधित पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.
स्पर्धेसाठी अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२ व ८-अ उतारा, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र तसेच संबंधित क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा सादर करणे आवश्यक आहे. अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना प्रति पीक ३०० रुपये, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना प्रति पीक १५० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. जिल्हास्तरावर अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये, तर तालुकास्तरावर ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.
उत्पादनवाढीस चालना देण्यासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधू-भगिनींनी या पीकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.
Applications open for the state-level crop competition; farmers urged to participate in large numbers. - Competitions for 11 crops to be held at the
#MediaVNI #Gadchiroli #Maharashtra #State #Agriculture #breaking #MarathiNews